महाबळेश्वर येथे आयोजित पर्यटन उत्सवाचे अत्यंत सुंदर, आटोपशीर व नेटके आयोजन केले आहे. आंतरराष्ट्रीय महोत्सवाला साजेसे असे आयोजन असून या महोत्सवामुळे पर्यटन वाढीला निश्चितपणे चालना मिळेल व या पर्यटन उत्सावामुळे महाबळेश्वरचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर जाणार, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्यक्त केला.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, पर्यटन विभाग महाराष्ट्र शासन यांच्या तर्फे आयोजित दि. 2 ते 4 मे या कालावधीत महापर्यटन उत्सव महाबळेश्वरचे आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्घाटन उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्याहस्ते झाले. या प्रसंगी पर्यटन मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, आमदार तुकारात ताके, पर्यटन विभागाचे महाव्यवस्थापक मनोजकुमार सुर्यवंशी, जिल्हाधिकारी संतोष पाटील, उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, प्रभारी पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, अपर जिल्हाधिकारी मिल्लार्जुन माने, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद, पर्यटन विभागाचे संचालक बी.एन. पाटील, प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार तेजस्वीनी पाटील, ब्रॅन्ड अँब्यासिटर मृणाली देव-कृलकणी, नवेली देशमुख, जपानचे कॉन्सुलेट जनरल यमाशिता सान आदी उपस्थित होते.
महाबळेश्वर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. याला ऐतिहासिक वारसा आहे, असे सांगून उपमुख्यंत्री श्री. शिंदे म्हणाले, महाबळेश्वरच्या इतिहासात पहिल्यांदाच असा महापर्यटन उत्सव होत आहे. पर्यटनमंत्री शंभूराज देसाई हे अत्यंत उत्साही असून अतिशय कमी दिवसात या महोत्सवाची केलेली तयारी अत्यंत दर्जेदार आहे. महापर्यटन उत्सवात विविध साहसी उपक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रम, किल्ले आणि शास्त्रप्रदर्शनी, फूड फेस्टिव्हल, साहसी खेळांचे उपक्रम, हेलिकॉप्टर यासह विवविध उपक्रम पर्यटकांसाठी राबविण्यात येत आहेत. फुड फेस्टिवलमध्ये विविध चवदार पदार्थ, मिलेटचे पदार्थ, औषधी पदार्थ यांचा समावेश आहे. बचत गटांनी उत्पादीत केलेल्या मालांचे ब्रॅन्डीग व्हावे यासाठी कायम स्वरुपी वितरण व्यवस्था निर्माण केल्यास लाडक्या बहिणी लखपती होतील, असेही त्यांनी सांगितले.